महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते.

 जेव्हा मराठी बोलल्यामुळे आपल्याला हीन वागणूक मिळते तेव्हा आपले डोळे खाडकन उघडतात. (किमान ज्यांची मराठी अस्मिता थोडीफार जिवंत आहे त्यांचे तरी उघडतात.

कोर्टाच्या कामानिमित्त परवा मुंबईला गेलो होतो. लगेच दुसऱ्या दिवशीची तारीख मिळाल्याने मुंबईत मुक्काम करणं अनिवार्य होतं.
यावेळी मी एकटाच होतो. सोबत कोणीच कर्मचारी नव्हते.

कोर्ट नरीमन पॉईंट भागात असल्याने आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता परत कोर्टात यायचे असल्याने जवळपासच्या भागातच राहायचा माझा विचार होता.

नरीमन पॉईंटच्या जवळपास एकट्याची राहण्याची सोय हॉटेलमध्ये करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं आणि तशी गरज पण नव्हती.
म्हणून मोबाईल वरून जवळपासच्या भागातली Dormitory शोधली. (Dormitory म्हणजे एका मोठ्या खोलीत ४-५ बेड असतात. त्यामध्ये आपण शेअरिंग मध्ये मुक्काम करू शकतो.)

कुलाब्यात ताज हॉटेलच्या मागच्या गल्लीतली एक Dormitory बुक केली आणि टॅक्सी करून तिथे पोचलो.

कुलाब्यातल्या त्या इंग्रज काळातल्या इमारती, तिथे फिरणारे परदेशी नागरिक यांनी ते वातावरण आधीच इंग्रजाळलेलं असतं.
इच्छित स्थळी पोचलो. इमारत एकदा निरखून पहिली.

बाहेर एकाबाजूला छोट्या छोट्या चड्ड्या घालून कोल्ड्रिंक सारखं दिसणारं काही तरी पीत आणि सिगारेटी फुंकत बसलेल्या त्या तांबड्या केसांच्या परदेशी महिला आणि दुसऱ्याबाजूला इमारतीच्या भिंतींवर स्प्रे पेंटिंगने रंगवलेली भारतीय संस्कृतीची भडक चित्रे यामधून वाट काढत रिसेप्शन पर्यंत पोचलो.

रिसेप्शन टेबलावर चेकइन साठी एक ब्रिटीश मुलगा आणि मुलगी थांबले होते. त्यांच्या मागे अजून एक विदेशी तरुण रांगेत उभा होता. मी त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो.

 रिसेप्शनीस्ट असणारी भारतीय तरुणी त्या जोडप्याशी अस्खलित इंग्रजीत बोलत त्यांना जवळपासच्या ठिकाणांची माहिती देत होती. 
त्यांचा सोपस्कार उरकून झाल्यावर माझ्यापुढे उभा असलेला तरुण पुढे गेला. त्या रिसेप्शनीस्ट मुलीने हसून त्याच स्वागत केलं आणि त्याला इंग्रजीमध्ये सुचना करायाला सुरुवात केली. 

त्यावर तो तरुण लगेच म्हणाला “No English.. French.. French..!”.

 मुलीने स्मितहस्य करून त्याला थांबायला सांगितलं. फोन करून वरच्या मजल्याहून एका मुलीला बोलावून घेतलं. आलेली मुलगी देखील भारतीयच होती पण तिने आल्याबरोबर चार्ज घेतला आणि त्या विदेशी तरुणासोबत फ्रेंच मध्ये संवाद साधू लागली.

मला आश्चर्य आणि कौतुक पण वाटलं. आपल्या देशात, आपल्या हॉटेल मध्ये परदेशी नागरिक येतात त्यांच्या सोयीचं व्हावं. त्यांना परकं वाटू नये म्हणून हॉटेलवाल्यांना किती ही काळजी !

त्यांचं उरकलं एकदाचं.. आणि मी पुढे रिसेप्शन जवळ आलो. रिसेप्शनीस्टने माझं हसून स्वागत केलं आणि तिच्या नेहमीच्या  औपचारिक इंग्रजीत मला  “Sir..!  Your Name, Adress and Contact Number Please”  असं म्हणून रजिस्टर माझ्यापुढे सरकवलं.

मी तसाच उभा राहून तिच्या तोंडाकडे पाहू लागल्यावर, मला कदाचित ऐकू आलं नसावं असं समजून तिने मला पुन्हा सावकाश समजावून सांगितलं.  “Sir..!  Please register your Name, Adress and Contact number in..

तिचं वाक्य मध्येच तोडत मी लगेच उच्चारलो, “No English.. Marathi.. Marathi..!” माझं बोलणं ऐकून ती शेजारी बसलेल्या तरुणाकडे पाहू लागली.

तो दुसरा रिसेप्शनीस्ट तरुण तत्परतेने उठला आणि मला त्या मुलीने सांगितलेल्या सूचना हिंदीत समजावू लागला. मी त्याला स्पष्ट केलं की. “बाबा रे, मला हिंदी देखील येत नाही कृपया माझ्याशी मराठीत बोल.”

आता मात्र त्या दोघांनी कपाळावर आठ्या आणून एकमेकांकडे पंचाईत झाल्यासारखे पाहिलं आणि कुत्सितपणे हसू लागले.
पण मी माझ्या चेहऱ्यावरचा स्थितप्रज्ञ भाव जराही ढळू न देता, आणि माझ्या नजरेतला ठामपणा जराही कमी होऊ न देता त्यांच्याकडे एकटक पाहत तसाच उभा राहिलो.

 त्या मुलाने हातचे इशारे करत हिंदीतून सावकाशरित्या समजावण्याचा प्रयत्न केला पण मी शांतपणे तसाच उभा राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा काही ऐकणार नाही.

 त्या दोघांनी एकमेकांत चर्चा करून माझ्याशी मराठीत बोलण्यासाठी एका मुलाला फोन करून बोलावून घेतलं.
 त्या मुलाला यायला तब्बल १५ मिनिटं लागली.

तोपर्यंत माझ्यामागून ब्रिटीश, जर्मन, फ्रेंच सगळे त्यांच्या स्वतःच्या भाषेत बोलून एका मागून एक निघून जात होते आणि मी माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीत, कुलाब्यासारख्या जुन्या मुंबई भागात, मराठीतून बोलण्यासाठी, सोफ्याच्या एका कोपऱ्यावर, हातावर हात ठेऊन, चुतीया सारखा, येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या तोंडाकडे बघत, आपल्याच नालायकपणामुळे झालेल्या मराठीच्या दयनीय अवस्थेकडे षंढासारखा बघत, मराठी समजणारा कोणीतरी भेटवा म्हणून वाट बघत होतो.

शेवटी त्यांनी बोलावलेला मराठी मुलगा आला त्याने मला बेड दिला.

 त्याला मी मराठी येणारी एक तरी व्यक्ती रिसेप्शनवर न ठेवल्याबद्दल विचारलं तर म्हणे “साहेब, रिसेप्शनला मुलगी दाक्षिणात्य आहे आणि मुलगा उत्तर भारतीय, त्यांना इंग्रजी- हिंदी येते. कधी मराठी बोलायची गरजच पडत नाही.”

गरज पडत नाही?

 हे कुठे ऐकतोय?

मुंबईत?

ज्या मुंबईत ज्या मुंबईला महाराष्ट्रात घेण्यासाठी १०७ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या मुंबईत??

 राजधानी मुंबईतून मराठी तडीपार होत आहे, उपराजधानी नागपूर मधून मराठी तडीपार होत आहे, शैक्षणिक राजधानी पुण्यात याहून वेगळी परिस्थिती नाहीये.

बलिदान देणारे आपलं काम चोख बजावून गेले आणि त्यांचा वारसा सांगणारे आपण आपल्याच राज्यात इतर राज्याच्या आणि इतर देशांच्या भाषा कुरवाळत बसलोय.

मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत ऐकतोय की इथे मराठी बोलायची गरज पडत नाही...!

परदेशी नागरिकाला गरज वाटू नये इतपत समजू शकतो. पण महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना, महाराष्ट्रात नोकऱ्या करत असताना त्या रिसेप्शन वरच्या मुलीला आणि मुलाला मराठी शिकण्याची गरज वाटत नाही?

या सर्वाला ही गैरमराठी मंडळी जबाबदार नसून आपण मराठी स्वतः जबाबदार आहोत.

मराठी म्हणजे डाऊन मार्केट, मराठी म्हणजे चीप.

मोठ्या हॉटेलात, सिनेमागृहात, चकचकीत मॉलमधल्या पाश्चिमात्य नावं असलेल्या दुकानांमध्ये, कुठेही मराठी बोललं की आपल्याला घाटी समजलं जाईल का? मराठीतून बोललं की टॅक्सीवाला थांबेल की नाही? मराठीतुन बोललं की भाजीवाला भैय्या कशी वागणूक देईल? अशी मराठी माणसाचीच मानसिकता होऊन बसलीये.

इंग्रजी बोलला म्हणजे भारी, हिंदी बोलला म्हणजे मध्यम आणि मराठी बोलला म्हणजे घाटी, थर्ड क्लास?

ते हिंदी भाषिक म्हणजे इंग्रजांचे गुलाम आणि आपण मराठी भाषिक हिंदी भाषिकांचे म्हणजे गुलामांचे गुलाम .

अजून पण वेळ गेलेली नाही.

 मराठीतून बोला, आपल्या घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना मराठीतून बोलायला प्रवृत्त करा.

 परभाषिक इथे येतात, व्यवसाय करतात, नोकऱ्या करतात. करू दे पण त्यांना हे पण लक्षात येऊ दे की महाराष्ट्रात येऊन पोट भरायचे असेल तर किमान मराठी येणे गरजेचे आहे.

 महाराष्ट्रात जिथे कुठे जाल तिथे फक्त मराठीचा आग्रह धरा, कुणी मराठी बोलत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या.
नाहीतर आज मराठी बोलल्यावर फक्त हसलं जातंय.

आपण जर असेच वागत राहिलो तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढीने मराठी बोलल्यावर एखाद्या टॅक्सीवाल्याने, एखाद्या दुकानदाराने “हिंदी में बात कर, साला घाटी..!” म्हणून त्यांच्या कानशिलात लगावू नये म्हणजे मिळवलं.